कार्ला, {संजय हुलावळे} – काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव दोनशे रुपये प्रतिकिलो पर्यंत गेले होते. त्यामुळे मावळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले. मात्र सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळत नाही. तर दुसरीकडे यंदा तापमान वाढीचा सर्वाधिक फटका टोमॅटोला बसताना दिसत आहे. छोटी रोपे करपून जात आहेत.
मरीचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डाली लावाव्या लागत आहेत. काही शेतकऱ्यांच्या अख्ख्या बागा तापमान वाढीमुळे गेल्या आहेत. तर काहींना दुबार लागण करण्याची वेळ आली. छोटी रोपे जगविण्यासाठी शेतकरी पंपाच्या साहाय्याने रोपांना पाणी घालताना दिसत आहेत.
यंदा तापमान वाढीमुळे टोमॅटोचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी विविध मार्गांनी रोपे जगविण्यासाठी व त्यांची वाढ होण्यासाठी धडपडत आहेत. काही शेतकऱ्यांनी बागांना मांडव घातले; परंतु त्याचाही फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून आले. सध्या शेतकरी रोपांवर पाण्याची फवारणी करताना दिसत आहेत.
आंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळ याठिकाणच्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उन्हाळ्यात मार्च-एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोच्या लागणी केल्या जातात. ढगाळ वातावरणामुळे किडीचा, रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो,
तसेच फुलकळी गळती होते. छोटी रोपे आकसा, करपा यांना बळी पडतात, तसेच वाढत्या तापमानामुळे फळ वाढीवर परिणाम होत असून, वेळेआधीच फळे पिकणे, फुलांची संख्या घटणे, टोमॅटो पळकणे, फुटवा कमी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
सध्या काही शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा सुरू आहेत. दराची घसरण आणि तापमान वाढीचे नैसर्गिक संकट यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल आहे. त्यात पावसाचा फटका बसल्यास संपूर्ण बागा हातातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली
तापमान वाढीचे संकट असतानाच गेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर तयार होणारे ढगाळ वातावरण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. ढगाळ वातावरण हानिकारक असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आधीच तापमान वाढीचा फटका बसला असताना ढगाळ वातावरणाचे नवीन संकट टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.