बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणांवेळी धास्तावलेले दिसतात. कदाचित त्यांच्या डोळ्यांत व्यासपीठावरच अश्रू दाटतील, असा शाब्दिक टोला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लगावला. कर्नाटकमधील प्रचार सभांमध्ये बोलताना राहुल यांनी प्रामुख्याने मोदींना लक्ष्य केले.
गरिबी, बेरोजगारी, महागाई हे देशातील प्रमुख मुद्दे आहेत. मात्र, मोदी विविध मार्गांचा अवलंब करून जनतेचे लक्ष विचलित करत आहेत. कधी ते चीन आणि पाकिस्तानविषयी बोलतात. तर, कधी थाळ्या वाजवण्यास सांगतात. तरूणांनी रोजगाराविषयी विचारल्यावर ते पकोडे बनवण्यास सांगतात. मोदींच्या राजवटीत बेरोजगारी करोनासारखी पसरली, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
मोदींनी गरिबांकडील पैसे हिसकावून काहींना अब्जाधीश बनवले. ते पैसे आम्ही पुन्हा गरीब जनतेला देऊ. केवळ कॉंग्रेस पक्षच बेरोजगारी आणि महागाई हटवू शकतो. आम्ही जनतेला त्यांचा न्याय्य वाटा देऊ, अशी ग्वाही राहुल यांनी दिली.
यावेळची निवडणूक आधीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राज्यघटना आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्यांचा बचाव करण्यासाठी आम्ही लढत आहोत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.