मुंबई : राज्यात काल महाभूकंप झाला असून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेणारे हे सर्व शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले सर्व लोक सहकारी नाहीत, तर कुटुंबातील लोक आहेत,” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे. “कोणाच्याही आयुष्यात कितीही संघर्ष करण्याची वेळ आली, तर साताऱ्याची सभा आणि शरद पवारांनी ‘आश्वासक चेहरा कोण’ यावर दिलेलं उत्तर, हे उर्जा देणारं आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. त्यातून नाउमेद होण्याचा एक मार्ग असतो. दुसरा मार्ग नव्या उमीदीने नवं उभं करायचं आहे.”असे त्यांनी यावेळी म्हटले.
त्यासोबतच “राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले सर्व लोक सहकारी नाहीत, तर कुटुंबातील लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून दोन-अडीच दशके काम करत आहे. शरद पवार हे सर्वांसाठी अतिशय प्रिय आहेत. शरद पवारांनी सर्वांना घरातील मुलासारखं वागवलं. त्यामुळे ही झालेली घटना आम्हाला वेदना देणारी नाही. पण, त्याची काही कारणं असतील,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
“आता पुन्हा एकदा संघटना नव्या उमेदीने उभी करत लोकांबरोबर जायचं आहे. पुढे जात महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करत चांगलं काम उभे करायचं आहे. ही आमच्या सर्वांवरची जबाबदारी आहे,” असा निर्धार सुप्रिया सुळेंनी व्यक्त करत “२०१९ चा शपथविधी आणि २०२३ या चार वर्षात थोडीशी जबाबदारी माझ्यावरही आली आहे. तेवढी प्रगल्भता माझ्यातही आली आहे. कारण, आपलं काम आणि नाती या गल्लत घालायची नाही,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.