मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडाचा झेंडा फडकावत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. याच राज्यातल्या महाभुकंपानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रव यावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
राज्यातील राजकीय भुकंपानंतर मनसेकडून शिवसेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. आता तरी एकत्र या, अशी मागणी या बॅनरवर करण्यात आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या राज-उद्धव यांच्यासोबत फोटो लावण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला. राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
सोशल मिडीयावर सुद्धा राज-उद्धव एकत्र यावे अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. शिवनसेना भवन परिसरातील या बॅनरची आता जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेणारे हे सर्व शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते. त्यामुळे हा शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.