नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या महाभूकंपानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलत चालल्याचे चित्र दिसून येत येत आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून एकमेकांवर आता आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात येत आहेत. राज्यात ही परिस्थिती असताना आता याचे पडसाद देशातही पडत आहेत कारण दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी दिल्लीत अजित पवार गटाचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमदार, खासदार, राज्य कार्यकारणी, पदाधिकाऱ्यांच्या कालच्या बैठकीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत ‘गद्दार’असा उल्लेख करुन बॅनर लावले. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही लावण्यात आले. दिल्ली महानगर पालिकेनेकारवाई करीत बॅनर हटवले आहेत.
#WATCH | Delhi | NCP President Sharad Pawar's posters and hoardings were removed by New Delhi Municipal Council (NDMC).
Meanwhile, Sharad Pawar left his residence for Delhi where the party's National Executive meeting is scheduled for today. Amid NCP vs NCP crisis in… pic.twitter.com/RLeluKHiHY
— ANI (@ANI) July 6, 2023
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. पक्षावर पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून मोठी पावले उचलली जात आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाले आहेत. सकाळी 8 वाजता सिल्वर ओक निवासस्थानावरून मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय कार्यकारणी पार पडणार आहे.
दरम्यान, काल अजित पवार गटाने घेतलेल्या मेळाव्यानंतर त्यांच्याकडे संख्याबळ असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या नेत्यांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केले. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि खुद्द अजित पवारांनी काकांवर गंभीर आरोप करीत टीकास्र सोडलं होतं.