दहिवडी – लोकशाही वाचविण्यासाठी, मोदी आणि शहा यांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना घरी बसविण्यासाठी, महागाई वाढवून गोरगरिबांचे कंबरडे मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे माढा व सातारा येथील उमेदवार एक लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माढा लाेकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथील सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, अनिल देसाई, डॉ. महेश माने, रणजित देशमुख, विश्वंभर बाबर, पिंटू मांडवे आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, माढा आणि सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे दोन्हीही उमेदवार कर्तबगार आणि अन्यायाच्या विरोधात चिडून उठणारे आणि जनतेच्या विकासासाठी विकासासाठी रक्ताचे पाणी करणारे, अहोरात्र झटणारे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आ. जयंत पाटील म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले की माण खटावचा आमदारही शरद पवार यांच्या विचाराचा होईल. उमेदवारी मिळाली नाही तरीदेखील अभय जगताप यांनी निष्ठा सोडली नाही. त्यामुळे माण खटावमधून मताधिक्य मिळणार यात शंका नाही.
माणच्या आमदारानी पोलीस आणि तहसीलदारांना हाताशी धरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले आहेत. यापुढे असले प्रकार मी चालू देणार नाही. इथून पुढे कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर एक फोन करा मी एका तासात तिथे येतो, असे सांगून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपने शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, पोलीस, शासकीय कर्मचारी सर्वांवर अन्याय केला आहे, तो आपल्या थांबवायचा असल्याचे स्पष्ट केले.
प्रभाकर देशमुख म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री असताना माण- खटावला पाणलोट विकास क्षेत्रासाठी दोनशे कोटी रुपये निधी देण्यात आला. आंधळी धरणात आलेले पाणी जनतेला द्यायची इच्छा नाही, जनता पाण्यासाठी टाहो फोडतेय. धरणातील पाणी बाष्पीभवन होऊन निघून जातेय. म्हणून माणच्या लबाड प्रतिनिधींना खासदारांसोबत घरी बसवण्याचे काम जनता करेल. मनुवाद्यांच्या तावडीतून देश सोडविण्यासाठी आणि हुकूमशाही बंद करण्यासाठी माण खटावमधून धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य देईल, असे अभयसिंह जगताप यांनी सागितले.