विश्रांतवाडी : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पीएम केअर्स फंडमध्ये मदत दिली. परंतु पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या ‘स्वच्छतादूत’ महिलेचं औदार्य सगळ्यांसमोर सरस ठरेल असंच आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या महिलेने १५ हजार रुपयांची मदत केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तरी देखील मनाने श्रीमंत असलेल्या त्या दानशूर महिलेचे नाव गवळणबाई मुरलीधर उजागरे असे आहे.
गवळणबाई विश्रांतवाडीतील भीमनगर या झोपडपट्टीत राहत असून त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. त्या गेल्या २० वर्षांपासून धानोरीतील स. नं. ५१, भैरवनगर परिसरातील घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करतात. प्रत्येक घरातून दरमहा त्यांना ६०ते ७० रुपये दिले जातात. त्यातही काहीजण पैसे देत नाहीत. तरीदेखील त्या सर्व घरातील कचरा नियमित गोळा करतात. दरमहा मिळणाऱ्या जेमतेम पाच ते सहा हजार रुपयांवर त्यांचा चरितार्थ चालतो. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही. काही अडचणीच्या प्रसंगी अथवा औषधोपचार करण्यासाठी बचत केलेले पैसे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देण्याचे औदार्य दाखविले आहे.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कराळेकर व छावाप्रमुख धनंजय जाधव यांच्या माध्यमातून ऑनलाईन मुख्यमंत्री फंडात ५ हजार रूपये निधी दिला. तसेच कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्यांनो धानोरीतील माता जिजाऊ प्रतिष्ठान व विश्रांतवाडीतील जीवनज्योती प्रतिष्ठान या दोन सेवाभावी संस्थांना प्रत्येकी ५ हजार रूपये असे एकूण १५ हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे. या सेवाभावीवृत्तीचे परिसरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून त्यांचे आभार मानले.
आजपर्यंत असं भयंकर संकट कधी बघितलं नव्हतं. संकटकाळात सगळ्यांनी मदत केली पाहिजे. आपण जगलो तर पुढे अजून कमावता येईल. पण आता लोकांची गरज भागवणं गरजेचे असल्याची भावना गवळनबाईंनी व्यक्त केली. कोरोनाच्या या संकटातही त्या कचरा वेचण्याचं काम करतच आहेत. “धोका आहे म्हणून जर सगळेच घरात बसले तर आपलं पोट कसं भरणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा परिस्थितीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. करोनावर मात करण्यासाठी सध्या अशाच शूरवीरांची गरज आहे.