पुणे : भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत मुलाच्या आई-वडिलांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे नुकसान भरपाई मिळविण्यसाठी दावा दाखल केला.
मात्र, अपघातातील चारचाकी गाडीचा विमा नव्हता. त्यामुळे गाडी मालकाच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. मध्यस्थी न्यायालयाकडे तडजोडी होऊन अवघ्या दुसऱ्या तारखेलाच हे प्रकरण निकाली निघाले.
चारचाकीच्या मालकाने मयताच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये भरपाई दिली. अर्जदार आई-वडिलांच्या वतीने ॲड.ओंकार रावडे व ॲड. प्राची जोग यांनी काम पाहिले. तर गाडी मालकातर्फे ॲड. अमित राठी आणि ॲड. अविनाश पवार यांनी काम पहिले. त्यांना ॲड. पूनम मावाणी व ॲड. आदित्य जाधव यांनी सहकार्य केले.
ही घटना १९ जुलै २०२३ रोजी पाषाण येथील एमआरडीईच्या गेटसमोर रात्री ८.३० च्या सुमरास घडली. दोन युवक दुचाकी वरून जात होते. भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार रोहन धनराज गायकवाड याचा मृत्यू झाला.
गाडीचालक याच्यावर सदोष मनुष्यवधाचा (भादंवि कलम 304 अन्वये) चतृश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. अपघाती मृत्यू झाल्या प्रकरणी मृत मुलाच्या आईवडिलांनी नुकसान भरपाई मिळणे कामी येथील मोटार अपघात प्राधिकरण येथे अर्ज केला होता.
मात्र, अपघातास कारणी ठरलेल्या गाडीचा विमा नसल्याने गाडी मालकाच्या विरुद्ध दावा दाखल केला. हे प्रकरण मध्यस्थी न्यायालयाकडे पाठविण्यात आले.
त्या मार्फत अर्जदार आणि गाडी मालक यांच्यात मध्यस्थी न्यायालय अति मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांचे पुढे चचेअंती तडजोड होऊन ५ लाख रुपये देऊन दुसऱ्या तारखेस दावा निकाली निघाला.