मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये आज शस्त्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसरीकडे आज विधानपरिषदेच्या मतदान आणि निवडणुकीच्या निकाल देखील लागणार आहेत. याच दोन्ही गोष्टींची सांगड घालत शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी याला राजकीय जोड दिल्याचे दिसत आहे.
राज ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थासाठी आणि आरोग्यासाठी मनसेचे कार्यकर्ते प्रार्थना करताना दिसत आहेत.त्यातच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीही राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी राजसाहेब आपण लवकर बरं व्हा असे म्हटले आहे. मात्र त्यातही अप्रत्यक्षपणे भाजपला टोला देखील त्यांनी लगावला आहे.
दिपाली सय्यद यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस एकटेच पडू नयेत म्हणून राज ठाकरेंनी लवकर बरं व्हावं असं म्हटले आहे. “माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील,” असं दिपाली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुढे बोलताना त्यांनी, “भोंगा अजून अर्धवट आहे,” असेही म्हटले आहे.
दिपाली यांनी या ट्विटमध्ये स्वत:च्या पक्षासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र भाजपाचे ट्विटर हॅण्डलही टॅग केले आहे.