भाऊ ठाकूर
राहू – दौंड तालुक्यात पूर्वी गावात भावकीचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालत असे. ज्याची भावकी मोठी त्याचे निवडून येणे नक्की असायचे. आजही गावपातळीवर राजकारण करताना भावकीचा किंवा एका गठ्ठा मतांचा विचार केला जातो. ज्याची भावकी मोठी, त्यांना दोन पद जास्तच द्यावी लागतात. पण अलीकडे एक नवीनच पद निर्माण झाले आहे. या पदाने चांगल्या-चांगल्यांची झोप उडविली असून भावी, इच्छुक उमेदवारांमुळे गावकीची आणि प्रस्थापितांची पंचाईत झाली आहे.
ग्रामीण भागात अलीकडे वाढदिवस साजरा करण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. सोशल मीडियामुळे तर हा वाढदिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो की काय, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यातूनच सुरवात होते भावीची. एखाद्या तरुणांचा वाढदिवस असेल तर त्याला माहित होण्याच्या आधी व्हॉट्सऍप ग्रुपवर किंवा फेसबुकवर भावी सदस्य, भावी सरपंच, भावी अध्यक्ष, भावी जिल्हा परिषद सदस्य आदी विभुषणे लावून त्याचा भाव वाढविला जातो.
मग त्याला ही आमदार झाल्यासारखे वाटते. मग तो गरीब असो की श्रीमंत. तो आपला खिसा रिकामा केल्याशिवाय राहत नाही. यातून काही तरुण बाहेर पडतात तर काही त्यात वाहत जातात. यामध्ये पैसेवाला हा त्याचा धंदाच राजकारण आहे, तो या पब्लिसिटीसाठी फायदा करून घेतो. परंतु गरीब मात्र मित्रांच्या मोठेपणाला फसतो. आपले आर्थिक व सामाजिक नुकसान करून घेत आहे.
बाकी काहीही असले तरी अनेक भावी हे त्यातून बाहेर पडतच नाही. अनेक प्रस्थापितांना मोठी अडचण निर्माण होते. कारण प्रस्थापितांचे राजकारण हे ठरलेले असते, की यावेळेस राजकीयदृष्ट्या कोणाला संधी द्यायची. त्यातून भविष्यात होणाऱ्या महत्वाच्या पदावर आपण कसे बसायचे. परंतु या भावीच्या डोक्यात हवा भरल्यामुळे तो कोणाचेही ऐकत नाही. आपल्या खाऊगल्ली मित्रांच्या चुकीच्या सल्ल्याने निवडणुकीला उभे राहून आपले आर्थिक नुकसान करून घेत असतो. परंतु यामुळे प्रस्थापितांची गणिते तो बिघडवत असतो. त्यातूनच गावच्या राजकारणात वादासारखे प्रकार घडत आहेत.
सामाजिक सलोखा बिघडतोय
भावी पदाचा तेवढ्या दिवसापुरात का होईना समाजाला व गावच्या राजकारणात कायमचा नक्की त्रास होत असतो. ज्याचा वाढदिवस असतो, त्याचे रिकामटेकडे मित्र देखील असतात. हे रिकामटेकडे मित्रच त्याच्यात हवा भरतात. खाण्या-पिण्याची हौस भागवून घेत असतात. खाणे-पिणे, तसेच चौकात किंवा रस्त्यावर केक कापणे,
मोठ्याने ओरडणे, एखाद्या तलवारीसारख्या हत्याराने केक कापून दहशत निर्माण करणे, केक एकमेकांच्या अंगावर फेकणे आदी प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम होत आहे. यातून सामाजिक सलोखा बिघडतोय, याचे भान कोणालाही राहत नाही. याला कोणताही नेता विरोध करीत नाही. कारण त्यात मताचे राजकारण दडलेले आहे.
विरोधकांचे पाठबळ
भावी नेते हे नेहमी विरोधकांसाठी एक ठेवणीतले अस्त्र झालेले आहे. कारण प्रस्थापित हे विरोधकांना राजकारणात टिकून देत नाहीत. भावीना देखील राजकारणात स्थान देत नाही. याचाच फायदा विरोधक घेत असतात. फोडा व राज्य करा या उक्तीप्रमाणे विरोधक भावीना ताकद देऊन गावकीची राजकारणात आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु त्यामुळे मात्र गावच्या राजकारणाचा पक्का इचका होत आहे.