वडगाव मावळ, {किशोर ढोरे} – मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय संदर्भाचे कवडसे गावपातळीवरील प्रचारात पडताना दिसत आहेत.
महायुती, महाविकास आघाडीत पक्ष एकत्र असले तरी भविष्यातील स्थानिक निवडणुकांत अडचण नको म्हणून काही गावांतील नेत्यांकडून स्वतंत्रपणे प्रचार सुरू आहे. त्यामुळे प्रचार एकाच उमेदवाराचा, पण तुमचा तुम्ही आणि आमचा आम्ही, असे चित्र दिसत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. १३ मे रोजी मतदान होणार आहे. सुरुवातीला बैठका, कोपरा सभा, जाहीर सभांवर भर होता. पण, गावागावांतील वातावरण तसे शांतच होते. आता अवघे पाच-सहा दिवस शिल्लक राहिल्याने गावागावांत घर-टू-घर प्रचार सुरू झाला आहे. गावपातळीवरील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. सकाळच्या सत्रात वाडी-वस्तीवर, तर सायंकाळच्या सत्रात गावात असे नियोजन दिसत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत राजकीय संदर्भ बदलले आहेत. परस्परविरोधी पक्ष महाविकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. जाहीर सभांतील व्यासपीठावर या पक्षांची नेतेमंडळी मांडीला मांडी लावून बसत आहेत.
पण, टोकाचा संघर्ष असलेल्या गावात, देशात-राज्यात पक्ष एकत्र असले तरी पारंपरिक विरोधक असलेल्या गावात कार्यकर्त्यांत मनोमिलन झाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडून एकाच उमेदवाराचा स्वतंत्रपणे प्रचार केला जात आहे.
भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. विरोधक असूनही आता एकत्र फिरलो, तर भविष्यातील निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो. आज गळ्यात गळा घातला तरी गावपातळीवरील निवडणुकीत परस्परविरोधी लढावे लागणार आहे. त्याचा फटका हक्काच्या मतांना बसू शकतो. तसेच मतदारांत आपल्याविषयी संभ्रम निर्माण होईल, या भीतीपोटी स्वतंत्र प्रचार करण्याची काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
सामान्य मतदार बुचकळ्यात
घरोघरी प्रचाराला फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडून प्रचार पत्रकांचे वाटप केले जात आहे. स्वतंत्र प्रचारामुळे मतदारांच्या घरात एकाच उमेदवाराची स्वतंत्र पत्रके दिली जात आहेत. पत्रकांवर उमेदवार, त्यांचे चिन्ह एकच दिसत आहे. पण, प्रचार करणारे स्वतंत्रपणे येत आहेत. राजकारणापासून दूर असणाऱ्या सामान्य मतदाराच्या हे आकलनापलीकडील असल्याने तो बुचकळ्यात पडल्याचे दिसून येत आहे.