किवळे, {उमेश ओव्हाळ} – ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे गावोगावी आर्थिक उलाढाल वाढत आहे. अनेक छोट्या- मोठ्या उद्योगांना यातून तारल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांना बळ मिळत आहे. जत्रा-यात्रांमुळे फिरत्या व्यावसायिकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची सोय होत आहे. एवढेच नव्हे, तर जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण बाज टिकविण्याचा प्रयत्न करीत अर्थकारणाचे चक्र फिरण्यास मदत होऊ लागली आहे.
चैत्र-वैशाख महिन्यात बऱ्याच गावांतील जत्रा यात्रांचा हंगाम सुरू होत असतो. शेतातील रब्बी पिकांची काढणी पूर्ण होऊन वाड्या-वस्त्यांवरील देवदेवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होतो. उन्हाळ्यात जत्रा यात्रांमुळे ग्रामीण भागांमध्ये वर्दळ वाढते. गावातील शहराकडे नोकरी, धंदा व शिक्षणासाठी गेलेले लोक सहकुटुंब यात्रेला आवर्जून हजेरी लावतात.
बैलगाडी शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा, होम मिनिस्टर, करमणूक कार्यक्रम, कुस्त्या, आइस्क्रीम पार्लर, हॉटेल, खेळणी दुकाने, पाळणे यातून गावोगावी आर्थिक उलाढाल होत आहे. शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळत असल्याने सुमारे चार-पाच महिने अनेक छोटे व्यावसायिक गावोगावी फिरताना दिसत आहेत.
जुन्या काळातील तमाशा फडांची जागा ऑर्केस्ट्राने घेतली असल्याने लोककला लोप पावत आहे. निम्म्याहून यात्रा-जत्रांतील आकर्षण हे लहान-लहान व्यावसायिकांच्या येण्यामुळे असते. वर्षात एकदाच मिळणारे हे मनोरंजन सुखदायक असते. त्यातून यात्रा जत्रांमधील उत्साह वाढतो. लहान वस्तू खरेदी करून या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे समाधान मिळवले पाहिजे. त्यातून त्या गावच्या यात्रांची शोभा वाढवेल तसेच आर्थिक उलाढालीस चालना मिळेल, असे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ सांगत आहेत.
ग्रामीण भागातील यात्रा- जत्रा, उरुस यामध्ये बैलांच्या शर्यती हे मुख्य आकर्षण असते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामुळे होत असते. पाणीपुरीवाल्यापासून ते कापड विक्रेत्यापर्यंत हा व्यापार गेली अनेक वर्षे सुरू असून, बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळत आहे. अधिक गावांच्या यात्रा संपल्या आहेत. उर्वरित यात्रा मेअखेर होत आहेत.
तमासगिरांवर उपासमारीची वेळ
यात्रांच्या काळात दरवर्षी रात्री उशिरापर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होत असे. कधी हाणामाऱ्या झाल्या तरच पोलीस यामध्ये हस्तक्षेप करून कार्यक्रम बंद करीत असे. मात्र आता निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने रात्री दहा वाजताच कार्यक्रम बंद केले जात आहे. त्यामुळे अनेक गावात यंदा तमाशाला वगळून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने तमासगिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.