पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी मागे घेतल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. ती मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी (दि. ५) मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये भारताने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले होते. त्यामुळे निर्यात होत नव्हती. परिणामी कांद्याला कमी भाव मिळत होता. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिली होती. आता केंद्राने निर्यातबंदी उठवली आहे. निर्यात बंदी उठताच कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील आठवड्यात मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला १५० ते १८० रुपये भाव मिळत होता.
तो रविवारी १८० ते २३० रुपयापर्यंत पोहोचला. किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये भावाने कांद्याची विक्री होत आहे. येथील बाजारात रविवारी (दि. ५) ८० ट्रक कांद्याची आवक झाली होती.
सध्या गरवी कांद्याचा हंगाम सुरू आहे. गावरान कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. अपेक्षित प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी आणि व्यापारी मालाचा जास्त प्रमाणात साठा करत आहेत.
निर्यातीला अटी, शर्ती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होईल, हे आताच सांगता येणार नाही. निर्यातीच्या परवानगीमुळे निर्यातदार व्यापारी कांदा खरेदी करण्यास सुरुवात करतील. मागणी वाढायला सुरुवात झाल्यावर भावात वाढ होईल. शेतकऱ्यांनी राखून ठेवलेला कांदा देखील बाजारात येण्यास सुरुवात होईल.- अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन.