कामशेत (वार्ताहर) – सध्या ग्रामीण भागात लग्नसराई मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत. लग्नाची शोभा वाढवण्यासाठी लग्न मालकांकडुन आग्रहाने नेतेमडंळीना बोलवले जात आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेख्यातर नेते मंडळी ही वेळात वेळ काढून लग्न सोहळ्यास उपस्थिती दर्शवित आहेत. परंतु यात नेतेमडंळीची मात्र मोठी ‘दमछाक’ होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.
उन्हांची तीव्रता वाढत असताना लग्न सोहळ्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे. त्यामुळे लग्न थाटामाटात साजरे होत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे उमेदवारांना उपस्थित राहता येत नसल्याने त्यांच्या वतीने इतर नेतेमंडळी लग्नाला उपस्थित राहुन आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्याचे काम सर्वच नेते मंडळी करत आहेत.
लग्नाला न गेल्यास कार्यकर्ता नाराज होईल म्हणून दिवसभरात वेळ नेतेमडंळी विवाह सोहळ्यास हजेरी लावत आहेत. परंतु एकाच दिवशी अनेक ठिकाणची निमंत्रण असल्याने उपस्थित दर्शविताना नेतेमडंळीची पुरती ‘दमछाक’ होत आहे.
दिवसभरात असलेल्या दहा ते बारा लग्न सोहळ्यास भेट देताना नेतेमडंळीना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे नेतेमडंळी आल्याशिवाय लग्न लावत नसल्याने नियोजीत वेळेपेक्षा लग्न उशीरा लागत आहेत.
लग्नपत्रिकेतही नेतेमडंळीनी मानाचे स्थान
लग्न सोहळ्याच्या पत्रिकेवर पूर्वी देवदेवतांचेच फोटो असायचे. परंतु, सध्या लग्नपत्रिकेचे स्वरूप बदलले असून नेतेमडंळीचेही फोटो छापण्याची पध्दत रूढ झाली आहे.