मकरंद पाटील समर्थकांचा सोशल मीडियावर नाराजीचा सूर
सातारा/वाई – राज्यभरात पक्षाच्या जीवावर मोठे झालेल्या अनेक नेत्यांसह नात्यातील लोकही शरद पवारांना म्हणजेच राष्ट्रवादीला सोडून जात होते. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांना नेहमीच झुकतं माप देण्यात आले, असे दोन्ही राजेही पवारांना सोडून भाजपमध्ये गेले.
परंतु, वाई विधानसभा मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांनी निष्ठेचा आदर ठेवत शरद पवार यांच्यासोबतच चालायचे ठरवत जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत बालेकिल्ला राखण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र, पवारांनी मंत्रिंमंडळाच्या विस्तारात मकरंद पाटील यांना डावलून निष्ठेची पायमल्लीच केली आहे, अशा भावना आमदार मकरंद पाटील समर्थकांमधून सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहे.
राज्यात भाजपचे वादळ असल्याने कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत हातात कमळ घेतले. विशेष म्हणजे पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातही शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करू पवारांना दणका दिला. मात्र, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि दीपक चव्हाण यांनी पवार यांच्यावरील निष्ठेला प्राध्यान दिले. विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला.
मात्र, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील तसेच दीपक चव्हाण यांनी निवडणूक जिंकत बालेकिल्ला राखला. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना- भाजप यांच्यातील युती तुटली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीचे सरकारही स्थापन झाले. सरकारस्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. विशेष म्हणजे विस्ताराविनाच अधिवेशनही पार पडले. अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला.
शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत कमालीची गोपनियता तीनही पक्षांकडून बाळगण्यात आली. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पूर्वसंध्येला ज्यांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत, त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले.
आमदार मकरंद पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन पवार कै. तात्या यांच्यासह पाटील घराण्याबरोबर मतदारसंघातील जनतेच्या निष्ठेचा गौरव करतील अशी अपेक्षा होती. मात्र, पवारांनी मकरंद पाटील यांना डावलल्याने मतदारसंघात जनतेतून नाराजीचा सूर उमटला.
शिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या किमान दोन आमदारांना मंत्रिपदे मिळणार, याची जोरदार चर्चा होती. अखेरच्या क्षणी केवळ एकाच मंत्रिपदावर बालेकिल्ल्याची बोळवण करण्यात आल्याची टीकादेखील सोशलमीडियावर होऊ लागली आहे. पक्षाच्या सुरुवातीपासून पवार यांना कै. लक्ष्मण पाटील यांनी साथ दिली. जिल्ह्यात पक्षाला बळकटी दिली, तात्यांचे सुपुत्र मकरंद पाटील यांनीही परंपरा कायम राखत मतदारसंघासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्ष मजबूत करत वाढविण्यावर भर दिला.
तसेच कार्यकर्त्यांवरील प्रेमामुळे आणि विकास कामे करण्याच्या त्याच्या चिकाटीमुळे मतदारसंघातील जनतेने जिल्ह्यासमोर त्यांची “जननायक’ अशी प्रतिमा तयार केली. त्यांच्या कर्तृत्वामुळे पक्षश्रेष्ठीं निष्ठेचे तसेच त्यांच्या कर्तृत्वाचे फळ नक्कीच देणार, मकरंद आबा मंत्री होणार अशी मतदारसंघ, जिल्ह्यातच नव्हे तर राज्यतही चर्चा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आमदारांसह मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेचीही अवहेलना केली आहे.
पवारांनाच थेट सवाल
सोमवारी झालेल्या मंत्रिंमंडळाच्या विस्तारात मकरंद पाटील यांचे नाव वगळल्याचे समजताच वाई विधानसभा मतदारसंघातील जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे सोशल मीडियावर थेट पवारांवरच नाराजी व्यक्त केली जात आहे. “साहेब! आमचं नक्की काय चुकलं, म्हणून आमच्या निष्ठेची अशी अवहेलना आपण केलीत, असा थेट सवाल मकरंद पाटील समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून पवारांना विचारु लागले आहेत.