मयूर सोनावणे
आनेवाडी टोल नाक्यावरील परिस्थिती; व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार
सातारा – केंद्र शासनाच्या आदेशानुसार पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी (ता. जावळी) येथील टोल नाक्यावर अखेर 15 डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांची टोल नाक्यावरील नित्याच्या वाहतूक कोंडीपासून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, फास्टॅगच्या अंमलबजावणीनंतरही आनेवाडी टोल नाक्यावर नेहमीप्रमाणेच वाहनांच्या रांगा लागत आहेत.
विशेषत: शनिवारी आणि रविवारी वाहनधारकांना टोल भरण्यासाठी तासन्तास ताटकळावे लागत आहे. टोल नाका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळेच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे. आनेवाडी टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगा लागणे, ही काही नवी गोष्ट नसली तरी वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक व प्रवासी वैतागले आहेत.
त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधनही वाया जात आहे. आनेवाडी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. नाताळ आणि वर्षाअखेरीमुळे सलग सुट्ट्या आल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषासाठी पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पुणे-सातारा मार्गिकेवर टोल नाक्यापासून विरमाडे गावापर्यंत अर्धा ते पाऊण किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना तासन्तास ताटकळावे लागले.
वाहतूक कोंडी, टोल भरण्यावरून, व्हीआयपी पासेसवरून होणारे वाद, मारामाऱ्या, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांना होणारी दमदाटी व अन्य कारणांमुळे आनेवाडी टोल नाका नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुरुवातीला टोल नाक्यावरील बूथची संख्या कमी असल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आनेवाडी गावच्या हद्दीत तर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी विरमाडे (ता. वाई) गावच्या हद्दीत स्वतंत्र बूथ उभारण्यात आले.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली; परंतु आता या बुथपैकी एखाददुसरे बुथ अनेकदा बंद ठेवण्यात येत असल्याने पूर्वीसारख्या वाहनांच्या रांगा टोल नाक्यावर लागत आहेत. देशभरातील टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी, गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र शासनाने दुचाकी, तीनचाकी वाहने सोडून सर्व प्रकारच्या वाहनांना फास्टॅग लावणे सक्तीचे केले आहे. आनेवाडी टोल नाक्यावरही 15 डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
त्यामुळे तेथील वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटेल, असा विश्वास वाहनधारक व प्रवाशांना वाटत होता. मात्र, तो फोल ठरतोय की काय, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. फास्टॅग यंत्रणा असतानाही शनिवारी आणि रविवारी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारक व प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीत अनेकदा रुग्णावाहिकाही अडकून पडत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आतच दगावण्याची भीती आहे.
मात्र, ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी टोल नाका व्यवस्थापन पुढाकार घेताना दिसत नाही. महामार्ग पोलीस, जिल्हा वाहतूक शाखा व भुईंज पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी टोल नाक्यावर नेहमी उभे असतात; पण ते केवळ वाहनधारकांना अडवून दंडाच्या पावत्या फाडण्यात किंवा त्यांना नाडून “वरकमाई’ करण्यातच मश्गुल असतात. या पोलिसांचे खरे काम टोल नाक्यावरील वाहतूक सुरळीत ठेवायचे आहे. मात्र, त्यांना तेथील वाहतूक कोंडीशी काहीही देणेघेणे नसते.
त्यातच टोल नाका व्यवस्थापनाचा कारभारही ढिसाळ आहे. या टोल नाक्यावरील बरेच कर्मचारी अर्धकुशल असल्याने वाहनधारकांकडून टोलचे पैसे घेऊन त्यांना पावत्या देण्यास नियमापेक्षा अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा टोल नाका व्यवस्थापनाच्या कारभारावर अंकुश ठेवून टोल नाक्यावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे.