मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थापन झाल्यानंतरही महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पत्ता नाही. मात्र, तरीही मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिग्गजांचा पत्ता कापून भाजपकडून नव्यांना संधी दिली जाणार असल्याच्या शक्यतेने अनेक बड्या नेत्यांना धडकी भरली असून भाजपा कार्यकर्त्यांत मंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा होत आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, विजय देशमुख या अनुभवी नेत्यांना संधी मिळणार की नाही याबाबत सध्या गुप्तता बाळगली जात आहे.चंद्रकांत बावनकुळे, मदन येरावार, परिणय फुके, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांची शक्यता मंत्रिमंडळात वर्तवली जात आहेत.
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपदी असल्याने त्यांच्याबाबत वेगळा विचार होऊ शकतो. प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती सापडत नसल्याने प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडेच राहील, असे मानले जाते. बहुतांश चेहरे नवीन दिले तर सरकारची घडी बसवून गतिमान कारभार देणे कठीण जाईल, असे सांगत अनुभवी लोकांना संधी देत जुन्या-नव्यांचे संतुलन साधावे असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न राहणार असल्याचे बोलले जाते.
तथापि, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मंजुरी मिळालेली नाही, असेही सांगितले जाते. सर्वोच्च न्यायालयाने काही वेगळा निकाल दिला तर भाजप-शिंदे यांच्याकडून विधान परिषदेच्या 12 जागांसाठी राज्यपालांकडे लगेच नावे पाठवायची आणि नियुक्त्या करवून घ्यायच्या अशीही रणनीती असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. तसेच निकाल शिंदे गटाच्या पारड्यात लागला तर मंत्रिमंडळ 44 जणांचे राहील, असेही नक्की झाल्याचे सांगितले जात आहे.
यांची वर्णी लागणार
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार व अतुल भातखळकरांची नावे नव्या विस्तारांत प्रामुख्याने घेतली जात आहेत. ठाणे जिल्ह्यातील रवींद्र चव्हाण, वर्धेचे समीर कुणावार, अकोल्याचे रणधीर सावरकर, वाशिमचे राजेंद्र पाटणी, नंदूरबारचे डॉ. विजयकुमार गावित, अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील, जालना जिल्ह्यातील नारायण कुचे, नागपूरचे प्रवीण दटके, नाशिकच्या देवयानी फरांदे, चंद्रपूरचे बंटी भांगडिया, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, पुण्याच्या माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाला नवीन चेहरे देण्याचा भाजपच्या श्रेष्ठींचा आग्रह असल्याने या नव्या दमाच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.