नवी दिल्ली – सध्याच्या परिस्थितीत उत्पादन आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. या वर्षात केवळ शेती क्षेत्राचा अर्थव्यवस्थेला आधार मिळणार आहे, असे या उद्योजकांच्या संघटनेने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
सध्याच्या परिस्थितीचा अंदाज यावा याकरिता फिक्की या संस्थेने अर्थतज्ञ, उद्योजक, बॅंकर इत्यादींशी चर्चा केली. यावेळी असे सांगण्यात आले की, यावर्षी विकास दर उणे 4.5% इतका कमी होऊ शकतो. करोनाचा संसर्ग ग्रामीण भागात कमी झाला आहे. पाऊस चांगला पडत आहे. त्यामुळे यावर्षी शेती क्षेत्राची उत्पादकता मात्र कमाल पातळीवर राहण्याची शक्यता आहे. यामुळे विविध कंपन्यांनी ग्रामीण भागाचा विचार करून पुढील उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र मोठ्या शहरात एकवटले आहे. मोठ्या शहरात संसर्गाचा जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता यावर्षी 11.4 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.8 टक्के राहील.
बहुतांश कंपन्यांचे उत्पादन त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी होत आहे. कंपन्या नवी गुंतवणूक करण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त सरकार आपला खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. सरकारने छोटे उद्योग आणि ग्रामीण रोजगारवाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
फक्त पुरवठा नको
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने जे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात पुरवठा वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. लघुउद्योजकांना भांडवल उपलब्ध करून वस्तूचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने भांडवल सुलभता उपलब्ध केली आहे. त्या भांडवलाचा वापर करून कंपन्या उत्पादन वाढविणे अपेक्षित आहे. मात्र, उत्पादन घेणार कोण हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे उत्पन्न वाढवून त्यांच्याकडून मागणी वाढण्याकरिता उपाययोजना करण्याची गरज आहे.