Arvind Kejriwal : सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी रात्री दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सुटले आणि थेट त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, यावेळी मार्गात ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते व समर्थकांनी जंगी स्वागत केले. घरी पोहोचल्यावर आईने त्यांची आरती केली तर वडिलांनी तिला मिठी मारली. यावेळी केजरीवाल आई-वडिलांच्या पायांना स्पर्श करून त्यांना मिठी मारून भावूक झाले.
केजरीवाल घरी पोहोचल्यानंतर ते गाडीतून खाली उतरताच आप नेते आणि पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी त्यांना मिठी मारली आणि उचलून घेतले. आत गेल्यावर त्यांनी आई-वडिलांच्या पाया पडून त्यांना मिठी मारली. यावेळी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी त्यांचे फुलांचा हार घालून स्वागत केले. दरम्यान, केजरीवाल घरी परतल्यामुळे आप पक्षाचे नेते कार्यकर्त्यांसह कुटुंबियांना मोठा आनंद झाला आहे.
50 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर –
दरम्यान, दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 50 दिवस तिहार तुरुंगात राहिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी संध्याकाळी अंतरिम जामिनावर बाहेर आले. बाहेर येताच ते गाडीत बसले आणि तिथे उपस्थित लोकांना नमस्कार करून ते थेट घराकडे रवाना झाले होते.
अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी तिहार तुरुंगाबाहेर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तिहार सोडल्यानंतर केजरीवाल कारमध्ये बसले आणि थेट घराकडे रवाना झाले. मात्र, कारागृहापासून काही अंतरावर गेल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना थोडक्यात आवाहन केले.
देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे –
देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी लढत असल्याचे ते म्हणाले. पण हा लढा माझा एकट्याचा नाही. या लढ्यात देशातील 140 कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे. उद्या 11 वाजता सर्वांनी हनुमान मंदिरात पोहोचावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तिथे आम्ही हनुमानजींचा आशीर्वाद घेऊन लढा चालू ठेवू. त्यानंतर उद्या दुपारी एक वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात पुढील रणनीतीही आखली जाईल.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने (SC) हा दिलासा दिला आहे.
अटींसह जामीन –
सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सांगितले की, जामिनाच्या अटींनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या अंतरिम जामिनाच्या कालावधीत त्यांच्या कार्यालयात किंवा दिल्ली सचिवालयात जाऊ शकणार नाहीत. कोणत्याही सरकारी फाईलवर उपराज्यपालांच्या मंजुरीशिवाय ते स्वाक्षरी करणार नाहीत. सध्याच्या खटल्यातील त्यांच्या भूमिकेबाबत ते कोणतेही भाष्य करणार नाहीत आणि कोणत्याही साक्षीदाराशी संवाद साधणार नाहीत. केजरीवाल यांना या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाइलमध्ये प्रवेश मिळणार नाही. न्यायालयाने म्हटले की, त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यात शंका नाही, परंतु अद्याप त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही.