हैदराबाद – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या समवेत सरकारी मालकीच्या परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास केला आणि प्रवाशांना कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या विविध योजनांबद्दल माहिती सांगितली.
राहुल आणि सीएम रेड्डी शहरातील दिल सुख नगर येथून बस प्रवासाला सुरूवात केली. राहुल यांनी आरटीसी बसमध्ये कॉंंग्रेस सरकारने पुरवलेल्या महिलांसाठीच्या मोफत बस प्रवास सुविधेबाबत माहिती घेतली. दरम्यान, तेलंगणातील मेडक येथे गुरुवारी एका जाहीर सभेत बोलताना, राहुल गांधी यांनी केंद्रात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर ३० लाख सरकारी नोकऱ्यांची रिक्तपदे भरण्याची ग्वाही दिली.
ते म्हणाले की, केंद्र सरकार मधील या जागा गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. लोक नोकऱ्या मागत आहेत पण मोदींनी त्या जागा भरण्याची तसदी घेतली नाही. आम्ही ४ जूनला केंद्रात सत्तेवर येत आहोत आणि ऑगस्ट महिन्यांपासून आम्ही ही भरती प्रक्रिया सुरू करू.
नरेंद्र मोदींनी देशातील कोट्यवधी तरुणांना बेरोजगार केले. पण त्यावर उपाय म्हणून काँग्रेस पक्षाने ‘पहिली नोकरी पक्क’ ही योजना आणली आहे. या योजनेत आम्ही प्रत्येक सुशिक्षित तरुणाला वार्षिक एक लाख रुपयांची शिकाऊ उमेदवारी मिळवून देणार आहोत.त्यामुळे दर महिन्याला रितसर साडे आठ हजार रूपयांचा पगार घेत हे सुशिक्षित युवक आपल्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतली आणि स्वताच्या पायावर उभे राहतील असे ते म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुका या दोन विचारसरणींमधील लढा आहे. भाजपला देशातील संविधान नाहीसे करायचे आहे. आपले संविधान देशातील गरीब, आदिवासी आणि ओबीसी वर्गातील लोकांचे संरक्षण करते.
राज्यघटना तयार होण्यापूर्वी भारतातील गरीब जनतेला कोणतेही अधिकार नव्हते. संविधानाने हे अधिकार दिले. संविधानाचे पुस्तक हे तुमच्या हृदयाचा आवाज आहे. काँग्रेस पक्ष आणि भारतातील कोट्यवधी जनतेने अनेक दशकांच्या संघर्षा नंतरदेशात हे संविधान लागू केले, मात्र भाजपचे लोक संविधान नष्ट करणार असल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत असे ते म्हणाले.