छत्रपती संभाजीनगर – भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना बदलतील असा दावा करून विरोधी पक्ष लोकांमध्ये भ्रम निर्माण करतो आहे, पण प्रत्यक्षात काँग्रेसनेच ८० वेळा घटनादुरुस्ती केली आहे, हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील माजलगाव शहरात आयोजित प्रचार सभेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की संविधान बदलता येणार नाही आणि त्यात फक्त दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात. काँग्रेसने आतापर्यंत ८० वेळा संविधान दुरुस्त्या केल्या आहेत.
काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे या देशातील जनता गरीबच राहिली. आम्ही १० वर्षे काम केले, पण ६० वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसने काहीही केले नाही, त्यामुळे आता ते काम दाखवून निवडणूक लढवू शकत नाहीत, त्यामुळे ते देशाच्या घटनेबाबत लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गडकरी म्हणाले. बीड मतदार संघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.