मुंबई – राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, आंब्यासह अनेक पिकांचे नुकसानदेखील झाले आहे. यानंतर हवामान खात्याने सांगितले की, पुढच्या काही तासांमध्ये अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सांगलीच्या वळवा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. तर अहमदनगरच्या पारनेरमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेगाने) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या काही तासांमध्ये पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने सांगितले.
अचानक आलेल्या या पावसामुळे राज्यभरात आंब्यासह काढणीला आलेल्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाच्या हलक्या सरी आल्याने उकाड्याने वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.