ठोस उपाययोजनांची गरज, माजी खासदार बाबर यांची मागणी
पिंपरी – शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असून त्याला आळा घालण्यात महापालिकेचे आयुक्त सपशेल अपयशी ठरले आहेत. एका ठिकाणी जास्तीत जास्त नागरिक जमणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. प्रभागातील सर्वच नागरिकांच्या “स्वॅब टेस्ट’ पालिकेने प्रभाग स्तरावर करून घ्याव्यात, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, स्वॅब टेस्टिंगसाठी महाविद्यालय, शाळा, प्रशिक्षण केंद्र, खासगी रुग्णालये ताब्यात घ्यावी. तिथे आवश्यक चाचण्या व नागरिकांना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था करावी. जास्तीत जास्त नागरिकांची करोना चाचणी केल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल. परंतु पालिकेचे कोणतेही नियंत्रण नागरिकांवर राहिलेले नाही. ठिकठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडलेला दिसतो.
शहरात साडेसहा पेक्षा अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, 30 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे. प्रशासनाची कोणतीही पकड नागरिकांवर दिसून येत नाही. मास्क घालणे बंधनकारक करावे. अथवा, त्यावर मोठा दंड आकारावा. सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्यास कडक उपाययोजना करण्यात याव्या. रुग्णांना जास्तीत जास्त खाटा कशा प्रकारे देता येतील, यासाठी विशेष प्रयत्न करावे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी. रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी. रुग्णवाहिका प्रत्येक प्रभाग स्तरावर तसेच रुग्णालयात उपलब्ध करून द्याव्यात.