लोणावळा: मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रविवारी (दि.23)रात्री आडोशी गावचे हद्दीत दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरडीचा रस्त्यावर आलेला राडारोडा बाजूला केल्यावर साधारण 4.30 तासाच्या खोळंब्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
रायगड जिल्ह्यातील आडोशी गावचे हद्दीत किमी 41 जवळ मुंबई लाईनवर रात्री 10.35 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून दगड व माती एक्सप्रेस हायवेच्या मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर आल्याने मुंबई लेनवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. सुदैवाने या घडतनेत कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झाले नाही. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील सर्व माती व राडारोडा बाजुला केल्यानंतर सदरच्या तीनही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या.
लोणावळा व रायगड जिल्ह्यातील बोर घाट परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे डोंगर भागात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या छोट्यामोठ्या घटना घडत आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने अलर्ट जारी केला असून बचाव पथक आणि यंत्रणा सज्ज आहेत. एक्सप्रेस हायवेला दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याने आयआरबी आणि बोर घाट क्षेत्रात बचावाचे काम करणारी ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ ही संघटना घाट क्षेत्रात लक्ष ठेऊन आहे.
रविवारी रात्री दरड कोसळल्याने कळताच त्याठिकाणी धाव घेत आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशन चा स्टाफ व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी भर पावसात आयआरबीचे जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने युद्ध पातळीवर ही दरड हटविली