वाघोली (प्रतिनिधी) : इको कार व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लोणीकंद-केसनंद अष्टविनायक रस्त्यावर रविवारी (दि.२८) सायंकाळी उशिरा सव्वा सातच्या सुमारास जोगेश्वरी मंदिरासमोर घडली. या अपघातात सणसवाडी परीसरातील तिघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे.
गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६), विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय ३६, तिघे रा. एलएनटी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत तर हेमंत लखमन दलाई (वय ३०, रा. शिक्रापूर) हा देखील गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. बारामती) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय ३६, रा. बालाजी पार्क, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील तरुणाने कार खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर गणेश, त्यांचे मित्र विनोद, विठ्ठल, हेमंत थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी रविवारी आले होते.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दर्शन घेऊन ते इको कारमधून लोणीकंद-केसनंद रस्त्याने निघाले होते. जोगेश्वरी मंदिरासमोर ट्रक व कारची सामोरासमोर धडक झाली. अपघातात गणेश, त्यांचे मित्र विनोद, विठ्ठल, हेमंत जखमी झाले.
ट्रकच्या धडकेत इको कारची पुढील बाजू चेपली होती. ही धडक ऐवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला होता. जखमी कारमध्येच अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच गणेश, विनोद, विठ्ठल यांचा मृत्यू झाला. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.