पिंपरी (प्रतिनिधी) – सर्व भारतीय नागरिकांच्या प्रतिष्ठेची हमी देणारे ’बंधुत्व’ हा शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेत आहे. मी सर्वप्रथम भारतीय आहे, ही भावना सर्वांनी ठेवली तरच बंधुत्व जोपासले जाईल आणि ‘माझे संविधान, माझा अभिमान’ असे प्रत्येकाला गौरवाने म्हणता येईल असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश संजय भाटे यांनी केले.
चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिजाऊ व्याख्यानमालेत समारोप प्रसंगी ’माझे संविधान, माझा अभिमान’ या विषयावर अॅड. भाटे बोलत होते. जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 34 वे वर्ष होते.
यावेळी चिखली येथील संतपीठाचे मानद संचालक अभय टिळक यांना ‘चिंतामणी पुरस्कार’, पंढरपूर येथे पालवी या संस्थेच्या माध्यमातून एचआयव्ही व एड्सग्रस्त मुलांचे, महिलांचे संगोपन करणार्या मंगलाताई शहा यांना ’जिजाऊ पुरस्कार’ व खडकवासला धरणात बुडणार्या सात तरुणींना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणारे संजय माताळे यांना ’क्रांतिवीर चापेकर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन महाराज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम, अतुल आचार्य, विजय भिसे, विश्वनाथ अवघडे, हेमा सायकर, राजेंद्र घावटे आदी उपस्थित होते. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.