पिंपरी (प्रतिनिधी) – प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन, सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू केलेल्या बीआरटी सेवेचा आता बोजवारा उडू लागला आहे. बीआरटी थांब्याचे दरवाजे आता केवळ शोभेपुरते उरले आहेत. तर रात्री पूर्ण क्षमतेने वीजदिवे सुरू केले जात नसल्याने थांब्यांवरील प्रवाशांना काहीशा अंधारातच बसची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे बीआरटीमधून प्रवास करणारे प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत.
शहरातील वाढत्या वाहनसंख्येवर नियंत्रण आणण्याकरिता वेगवान सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बीआरटी सेवेचा पर्याय स्वीकारण्यात आला. बीआरटी बसथांब्यांमध्ये रेल्वेच्या धर्तीवर एलइडी स्क्रिन लावण्यात आल्या होत्या. मात्र, त्या चोरी होऊ लागल्याने आज एकाही थांब्यावर स्क्रीन दिसत नाही.
परिणामी आयटीएमएस यंत्रणादेखील आजपर्यंत सुरू झाली नसल्याने नागरिकांना बसथांब्यावर नेमकी कोणत्या मार्गावर जाणारी बस येणार आहे, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे थांब्यावर आलेली बस पकडण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडत असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी थांब्यांवर लावलेले दरवाजे बस आल्यानंतर आपोआप उघडले जात असायचे. मात्र आता त्याची उपयुक्तता संपुष्टात आल्याने आता बंद असलेले हे दरवाजे केवळ थांब्यांची शोभा वाढवत आहेत. तर रात्री थांब्यांमधील काही ठराविक वीजदिवे सुरू ठेवतले जात असल्याने मिणमिणत्या प्रकाशात प्रवाशांना बसची वाट पहावी लागत आहे.
पीएमपीने दररोज प्रवास करणार्या प्रवाशांना बीआरटीमधील प्रवासादरम्यान असलेल्या त्रुटी समजतात. बसची अपुरी संख्या, अनेक बसमध्ये मंद प्रकाशात करावा लागणारा प्रवास हा आता नकोसा झाला आहे. पीएमपी प्रशासनाने आपल्या कारभारात सुधारणा करावी, अशी माफक अपेक्षा आहे. – शैलेश सावतडकर,