नगर -करोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची टीका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी केली. तसेच आम्हाला सरकार पाडण्याची अजिबात घाई नाही. महाविकास आघाडी सरकार हे एकमेकांच्या अंतर्गत स्पर्धेमुळे व विसंवादामुळेच पडेल. विरोधी पक्षाने एखाद्या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर त्या प्रश्नावर संवेदनशील होऊन राज्य सरकारने भूमिका घेतली पाहिजे होती. पण कॉंग्रेस व राष्ट्रवादीचं सोडा, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्चर्य वाटते की ते या दोन्ही पक्षांसोबत जावून कसे बिघडू शकतात? त्यांची संवेदनशीलता कशी इतकी शून्य होऊ शकते? असे ही त्या म्हणाल्या.
नगर शहर भाजपच्या कार्यकर्ता शिबिरात रविवारी फरांदे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. याप्रसंगी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, उपमहापौर मालन ढोणे, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सुनील रामदासी, सचिन पारखी आदी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ पदावर आहेत. सरकार चालिवण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. तीन पक्षांचे हे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून कधीही पडेल.
त्यासाठी आम्हाला स्वप्न बघायची किंवा प्रयत्न करायचीही गरज राहणार नाही. राज्य सरकार सामान्य लोकांना दिलासा देण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करीत आहे. वीजबिल माफी दिली जात नाही. मात्र मुद्रांक शुल्कात सवलत देवून सरकारने बिल्डर लॉबीचे भले केल्याचा आरोपही फरांदे यांनी यावेळी केला. राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करीत आहोत. मंदिर उघडावे, वीजबिल दरवाढ कमी व्हावी, याबाबतीत आम्ही आंदोलन केली.
महिलांवर अन्याय, अत्याचार झाले, त्यावर आंदोलन केले. दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. परंतु विरोधी पक्षाने नागरिकांच्या एखाद्या प्रश्नावर आवाज उठल्यावर त्या प्रश्नावर संवेदनशील होवून भूमिका सरकारने घेतली पाहिजे होती. पण कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सोडा, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्चर्य वाटते की ते या दोन्ही पक्षांसोबत जावून एवढे कसे बिघडू शकतात? त्यांची संवेदनशीलता कशी इतकी शून्य होऊ शकते?