पारनेर -दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकार आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता ते दडपण्याचा प्रयत्न करीत आहे का, तसेच या आंदोलनला हिंसक वळण लागल्यास त्यास जबाबदार कोण, शेतकरी देशाचे शत्रू आहेत का, असा सवाल करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनास आज पाठिंबा दिला.
हजारे यांनी अनेक दिवसांनंतर केंद्र सरकारवर शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून निशाणा साधला आहे. यापूर्वी राज्य सरकार चालले तर चांगले, नाही तर खटारा गाडी, असे वक्तव्य हजारे यांनी केले होते. त्यावर केंद्र सरकारबाबत हजारे गप्प का आहेत, असा सवाल विरोधक करत होते. मात्र हजारे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारलाही फटकारले आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हजारे यांनी समर्थन दिले आहे.
तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधत हजारे म्हणाले, देशाचे दुर्भाग्य आहे की एवढ्या दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याकडे सरकार लक्ष देत नाही. हे शेतकरी काही पाकिस्तानमध्ये राहात नाहीत. आपल्या देशात राहात आहेत. निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या दारात जावून मत मागितले जाते. मात्र निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचा विचार होत नाही.
शेतकऱ्यांचे आंदोलन हे शांतीच्या मार्गाने चालले आहे. मात्र उद्या शेतकऱ्यांवर हिंसाचार करण्याची वेळ येवू देऊ नये. तसे जर झाले, तर त्याला जबाबदार कोण असणार आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले गेले, हे बरोबर नाही. शेतकऱ्यांसोबत आज जे होत आहे, ते हिंदुस्थान-पाकिस्तान सारखे झाले आहे. देशातला शेतकरी हा देशाचा शत्रू नाही. आंदोलनाबाबत सरकारने शेतकऱ्यांबरोबर चर्चा करावी. चर्चेतून मार्ग निघेल. चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जावू शकतात, असे हजारे यांनी म्हटले आहे.