न्यूयॉर्क – भारतातील युवकांना फॉर्मल सेक्टरमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देण्यासाठी भारत सरकारने बदलत्या स्थितीचा अभ्यास करून दीर्घकालीन योजनांवर विचार केला पाहिजे, अशी सूचना प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि मोदी सरकारचे माजी सल्लागार अरविंद पानगडीया यांनी भारताला केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनच्या बाहेर पडून जगात अन्यत्र आपले बस्तान हलवण्याच्या तयारीत आहेत या संधीचा भारताने नियोजनपूर्वक लाभ घेतला पाहिजे.
करोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून त्याचा मोठा फटका भारतातील रोजगाराला बसणार आहे. सध्याचा करोनाची समस्या केवळ लस सापडेपर्यंतच राहणार आहे, आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन विचार करावा लागणार आहे असेहीं त्यांनी भारताच्या बाबतीत म्हटले आहे. आजही भारतातील अनेक युवक छोट्या शेतांमध्ये काम करून जीवन जगत आहेत. अनेकांना छोटे व्यवसाय करून अथवा छोटी दुकाने चालवून गुजराण करावी लागत आहे.
या युवकांना चांगल्या पगाराच्या कायमस्वरूपी नोकऱ्या फॉर्मल सेक्टरमध्ये उपलब्ध करून देण्यावर आपण आता आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केली पाहिजे असे ते म्हणाले. त्यासाठी आता भारताने छोट्या स्वरूपाचे औद्योगिक आणि सेवा प्रकल्प सुरू करण्याऐवजी या क्षेत्रातील मोठ्या क्षेत्राच्या उद्योग उभारणीकडे लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याने भारताने हीं संधी चुकवता कामा नये.
भारतात त्यासाठी ऍटोनॉमस इकॉनॉमिक्स झोन सुरू करण्याचा गांभीर्याने विचार व्हावा असेही त्यांनी सुचवले आहे. त्या अनुषंगाने भारताला जमीन आणि कामगार कायद्यांमध्येही मोठ्या सुधारणा कराव्या लागतील. सध्याच्या स्थितीच्या संबंधात त्यांनी म्हटले आहे की, भारतातील ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाची लागण अत्यल्प प्रमाणात आहे तेथील आर्थिक व्यवहार त्वरीत खुले केले पाहिजेत.