पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – यापूर्वी प्रत्येक पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात पाच ते सहा सभा व्हायच्या. आता पंतप्रधान प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहेत. यातून भाजपला पराभवाची भीती वाटत आहे, अशा शब्दांत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी टीका केली.
इंडिया आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, माजी शहराध्यक्ष डाॅ. अभय छाजेड, तसेच गोपाळ तिवारी, अक्षय जैन, राहुल सुरवसे आदी उपस्थित होते. तर, “तरुणांच्या प्रश्नावर भाजप सरकारने काहीच पाऊले उचलले नाहीत. गेल्या दहा वर्षांत केंद्राचा नोकरभरतीचा दावा खोटा आहे,’ अशी टीका कुणाल राऊत यांनी केली.
“भरती विश्वास’ कॅलेंडर
काँग्रेसने जाहीरनाम्यात युवकांना प्राधान्य दिले आहे, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. तसेच त्यांनी काॅंग्रेसचे “भरती विश्वास’ कॅलेंडर प्रसिद्ध केले. यात पुढील पाच वर्षांत काॅग्रेसकडून ३० लाख सरकारी नोकर भरती कशा प्रकारे केली जाईल, याचे पत्रक जाहीर केले. तसेच “महाराष्ट्रात तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. एमपीएसीच्या परीक्षेचे पेपर फुटतात. आम्ही आंदोलन करतो; पण काहीच निर्णय घेतले जात नाहीत. पेपरफुटीवर कायदा करावा,’ अशी मागणीही केली.