पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या १० वर्षांत पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे. १०० नगरसेवक, शहरातील सहाही आमदार आणि १ खासदार याबरोबरच केंद्रात व राज्यात सत्ता एवढे असूनही पुण्याच्या विकासासाठी मोठा विकास निधी केंद्र व राज्य सरकारकडून शहराला मिळाला नसल्याची टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. धंगेकरांच्या प्रचारार्थ कसबा विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढण्यात आली. त्यांनतर झालेल्या समारोप सभेत ते बोलत होते.
धंगेकर म्हणाले, की काँग्रेस पक्षाने सन १९९२ ते २०१७ या कालावधीत मित्रपक्षांच्या मदतीने पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ निर्माण केला. जवाहरलाल नेहरू योजनेतून पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून २५०० कोटी रुपयांचा विकासनिधी पुण्यासाठी आणला. त्यामुळे पुण्याच्या विकासात चांगली भर पडली.
त्यानंतर मात्र भाजप सत्तेवर आल्यावर गेल्या ७ वर्षांत पुण्याला कोणी वाली नाही, असे चित्र उभे राहिले. वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, पर्यावरणाचे प्रश्न, बेकारी अशा अनेक प्रश्नांमुळे पुणेकर त्रस्त झाले असल्याची टीकाही धंगेकर यांनी केली.
ही पदयात्रा शहराच्या पूर्व भागात झगडे आळी, घोरपडे पेठ पोलीस चौकी, घसेटी पूल, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, काची आळी, सुभानशा दर्गा, शितळादेवी चौक, गाडीखाना, पानघंटी चौक, राष्ट्रभूषण चौकमार्गे खडकमाळ आळी येथे समाप्त झाली.
आमदार धंगेकर यांच्यासोबत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर कमाल व्यवहारे, काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, नेहरू स्टेडियम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, शाबीर खान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश नलावडे, संदीप गायकवाड, सुमित डांगे, नीलेश बोरवडे, गणेश भंडारी, सागर कांबळे, शैलेश आंदेकर, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.