ओतूर, – पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी फार नम्रपणे सांगू इच्छितो की, होय शरद पवार हे आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. सर्वसामान्य शेतकर्यांचा महिलांचा आणि कष्टकर्यांचा युवकांचा आत्मा आहे, असे उत्तर देत खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधार्यांना अनेक दाखले दिले.
शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूरमध्ये जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार अॅड. राम कांडगे, बाळासाहेब दांगट, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर,
उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चौधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई इनामदार, अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सूरज वाजगे आदी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणएाले, हे जेव्हा भटकत होते जेव्हा भूजला भूकंप झाला होता. तेव्हा स्व. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळी संपूर्ण संसदेत विरोधकांना विरोध न करता मी भूजच्या पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे एकमेव आत्मा शरद पवार होते आणि आज तुम्ही आरोप करता.
जेव्हा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेत आंदोलन करत होता ना आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकर्यांची ताटात माती कालवत होता ना, तेव्हा काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकर्यांच्या ताटात माती कालवणार नाही, हे ठामपणे सांगणारी आत्मा शरद पवार आहे. याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो, कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्षं, घर फोडत नाही, असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
शरद पवारांनी सुनावले खडेबोल
पंतप्रधान राहुल गांधींवर टीका करतात. शहाबजादे क्या करेंगे? म्हणताना मोदींना कायतरी वाटायला हवं, असे शरद पवार म्हणाले. राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. आधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणार्या राजीव गांधींची हत्या झाली.
वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात शहाबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलतायेत. खोट्या गोष्टी सांगत आहेत. चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील. तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे.