अश्विनी घाडगे
कलमकारी चित्रकला ही आंध्रप्रदेशची अत्यंत प्राचीन लोककला आहे आणि नावाप्रमाणेच ती कलमापासून साकारण्यात येणारी कारागिरी आहे. या केलेचे मूळ आंध्रप्रदेशमधील श्रीकलाहस्ती आणि मच्छिलीपूरम शहरात आढळते. श्रीकलाहस्तीमध्ये आजही कलमकासाठी पेन वापरला जातो, तर मच्छिलीपूरममध्ये छापे मारण्याची परंपरा आहे.
इतर अनेक लोककलांप्रमाणे या कलेलाही स्थानिक मंदिरांचा आश्रय मिळाला. पुराण, रामायण आणि मानवी आकृती या चित्रांमध्ये दर्शविले गेले आहे. कलाकृतींच्या कडा फुलांच्या पानांच्या आकर्षक नमुन्यांसह सजवल्या जातात. सहसा संपूर्ण कुटुंब या कलेमध्ये गुंतलेले असते. कुटुंबातील प्रमुख या कलाकारांचे गुरू आहेत.
हा गुरू पांढऱ्या सुती कापडावर कलम घेऊन मुख्य चित्र रेखाटून कलमकारी सुरू करतो. यानंतर कुटुंबातील अन्य सदस्य त्यात रंग भरतात. हे रंग भाजीपाल्यापासून बनविले जातात. यास व्हेजिटेबल डाय असंही म्हणतात. यात रसायने वापरत नाहीत.
कापड एक तास राळ आणि गाईच्या दुधाच्या मिश्रणात भिजवले जाते आणि आंबलेल्या गुळामध्ये पाणी घालून बांबूच्या पेनने चित्राची रूपरेषा काढली जाते. जिथे रंग भरला जातो तेथे तुरटीचे द्रावण लावले जाते.
यानंतर कापड एका मिश्रणात भिजत घातले जाते, ज्याची प्रतिक्रिया चित्राचे रंग दर्शविण्यास सुरुवात करते. हे मिश्रण बनविण्यासाठी तसेच कापडावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया करण्यासाठी शेण, बियाणे, फुलझाडे आणि विविध पाने वापरली जातात.
कलमकारी केलेल्या कापडापासून परिधान करण्यासाठी वस्त्र, बेडशीट्स, तसेच भिंतीवर लावल्या जाणाऱ्या चित्रांपासून अगदी लॅम्प शेड्सही बनवले जातात. हे भारतातील सरकारी हस्तकलेच्या दुकानात सहज आढळतात.