– माधव विद्वांस
‘कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा’ या गाण्याचे गीतकार लोककवी मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू. आज मनमोहन नातू यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे 11 नोव्हेंबर 1911 रोजी झाला. त्यांचे शिक्षण पुणे, मुंबई, कल्याण, तळेगाव अशा अनेक ठिकाणी मॅट्रिकपर्यंत झाले.
त्याबरोबर मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा विविध भाषांतील साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. काळकर्ते शिवरामपंत परांजपे, त्यांचे शिक्षक विष्णू गोविंद विजापूरकर, कवी जयकृष्ण केशव उपाध्ये आणि अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवककार गं. दे. खानोलकर अशा अनेक दिग्गजांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. मीनाक्षी दादरकर हे त्यांचे एक टोपणनाव होते.
त्यांनी अंदाजे 5 हजार मंगलाष्टके लिहिली, भविष्यही लिहिले याशिवाय ऐतिहासिक तसेच सामाजिक कादंबर्या लिहिल्या. त्यामध्ये अभिलाषा, आनंदघन, इंद्रधनुष्याची गोष्ट, कड्यावरून कोसळलेली कामिनी, गुरुजींची आत्महत्या झपूर्झा, टिपरी पडघमवर पडली यांचा समवेश आहे.
श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा ताई तेलीण मारील सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा हा मनमोहनांनी लिहिलेला 63 ओळींचा पोवाडा 1926 साली प्रसिद्ध झाला. कवी मनमोहन यांना कवितेचे यमक जुळत असले तरी पैसा आणि व्यवहार याबद्दल फारशी जुळवाजुळव करता येत नव्हती. गरजेपुरता पैसा हाताशी असला की ते त्यांच्या लेखनात रममाण असायचे. घरात वाण सामानाची गरज उभी राहिली की त्यांची वणवण सुरू व्हायची. एके दिवशी त्यांच्या पत्नीने हातात चार पिशव्या दिल्या व सामानाची यादी दिली.
मनमोहन यांनी पिशव्या घेतल्या पण खिशात पैसे नव्हते. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांचे कविता लिहिलेले कागद घेतले आणि वर्तमानपत्र-मासिकांच्या संपादकांकडे गेले. ‘कविता घ्या आणि रेशनसाठी पैसे द्या’ असा नेहमीचा प्रस्ताव ठेवला. पण संपादकांनी तुमच्या प्रेमकविता सध्या नकोत आधीच्याच दोन कविता आमच्याकडे शिल्लक आहेत असे सांगून बोळवण केली. तसाच अनुभव दुसर्या ठिकाणी पण आला. त्यानंतर ते संगीतकार व गायक गजानन वाटावे यांच्याकडे गेले.
त्यांनीही अगोदर नकार घंटा वाजविली पण त्यांच्या डोक्यात एक विचार आला. त्यावेळी महात्मा गांधीजींची हत्या झाली होती. गजाननरावांनी थोडा विचार केला व नातूंना ते म्हणाले, ‘उद्यापर्यंत मला म. गांधीजींवर एक कविता लिहून आणून द्या. तुम्हाला साडेसात रुपये हवेत ना? गांधीजींवर कविता द्या, मी तुम्हाला पंधरा रुपये देतो.’ त्यावर नातू म्हणाले, ‘गांधीजींवर कविता लिहायची तर त्यासाठी उद्याची वाट का बघायची, आताच लिहून देतो.’
गजानन वाटवे यांच्या तिथे बसलेल्या मुलीच्या वहीतील एक कागद घेतला व लिहायला सुरुवात केली ‘ती पाहा ती पाहा। बापूजींची प्राणज्योती॥ नातू यांना 15 रुपये मिळाले. या कवितेची रेकॉर्ड रातोरात खपली. गीतकार व ध्वनिमुद्रकाला किती मिळाले महात्माजी जाणे.
त्यांनी अनेक भावगीते लिहिली. ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला’, सारख्या गीतामधून लाजलेल्या नववधूचे भावविश्व प्रकट केले आहे. त्यांचे 7 मे 1991 रोजी निधन झाले.