नगर -अहमदनगर कामगार जिल्हा संघटनेच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत येथील एमआयडीसीत आज कामगार कायद्याची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. केंद्र सरकारने कामगार कायद्यात दुरस्ती करावी, अशी मागणीकरत केद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी उपस्थित कामगारांनी दिल्या.
नगरच्या एमआयडीसीमधील सह्याद्री चौक येथे कामगार संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी कायद्याची प्रतीकात्मक होळी केली. संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, दत्ता तापकिरे, किरण दाभाडे, निलेश हिंगे व कामगार वर्ग उपस्थित होता.
देशाच्या जडणघडणीत कामगार हाच महत्त्वाचा घटक आहे. कामगारा शिवाय उद्योग क्षेत्राला भरारी येणार नाही. कामगारांचे हक्क व कामगारांची चळवळ मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात कामगारविरोधी चुकीचा कायदा पारीत करुन मंजुर करुन घेतला आहे.
या चुकीच्या निर्णयामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. या कायद्यामुळे कामगारांचे हक्क हिसकावून घेतले जाणार आहे. तसेच कामगार कायद्याची पायमल्ली होणार आहे, अशी भूमिका स्पष्ट करत कामगार कायद्यामध्ये घेतलेले निर्णय मागे घेण्यात यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्यावतीने यावेळी करण्यात आली.
अध्यक्ष संतोष लांडे, “”विधेयकात 300 पेक्षा कमी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीविना कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे किंवा त्यांना कामावरुन काढण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्याचबरोबर कामगारांच्या संपावर देखील मर्यादा येणार आहे. कामगारांना नोटीस दिल्याशिवाय संप पुकारता येणार नाही. या निर्णयामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे.”