नगर – पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या सारख्या राष्ट्रसेवा करणाऱ्या महान व्यक्तिमत्वाचा नावाने पतसंस्था सुरु करून, मोठी जवाबदारी घेतली आहे. सर्वसामान्यांना स्वतःच्या पायावर उभे करत आत्मनिर्भर व आधार देण्याचे पंडितजींचे कार्य ही संस्था पुढे नेत आहे. नियमित कर्जफेड करणारे चांगले कर्जदार दीनदयाळ पतसंस्थेस मिळत आहेत, हे मोठ्या प्रगतीचे लक्षण आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त विनोद तावडे यांच्या हस्ते संस्थेतील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच पतसंस्थेच्या कर्जाची नियमित परत फेड करणाऱ्या कर्जदारांचा सत्कार तावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे जिल्हाप्रभारी मनोज पानगावकर, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, भाजप शहराध्यक्ष महेंद्र गंधे, पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, सचिव विकास पाथरकर, जेष्ठ नेते एल.जी. गायकवाड, संचालक किरण बनकर आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात 25 कर्जदारांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन वसंत लोढा म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय हे या पतसंस्थेचे दैवत आहेत. त्यांच्या नावावर काम करणाऱ्या या संस्थेने दीनदयाळजींच्या नावाला कोणताही धक्का लागणार नाही, असे निष्कलंक काम संस्था करत आहे.