तळेगाव स्टेशन -भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज स्वातंत्र्याचा अर्थ कळेनासा झाला आहे. ज्यासाठी स्वातंत्र्य मिळवले, तो हेतू साध्य झाला का? असा सवाल सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी केला.
तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या जगत्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, बबनराव भेगडे, पं. सुरेश साखवळकर, विशाल जाधव, कृष्णकांत वाढोकर, वर्षा वाढोकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले की, विकास करताना त्यातील काही विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. समाज सुधारकांनी समाजातील वाईट चालीरिती बंद करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पण आज त्यांच्या नावाच्या फक्त घोषणा होताना दिसतात, हे दुर्दैवी आहे. बेरोजगारी वाढतच चालली आहे. असे असतानाही फक्त मोठमोठ्या आकड्यांच्या घोषणा होत आहेत. स्पर्धेच्या युगात महिलांना वाव दिला पाहिजे. स्पर्धा परीक्षामध्ये मुली चमकत आहेत. महिलांच्या हातात कारभार दिल्यास त्या उत्कृष्ट काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रास्ताविक सुरेश धोत्रे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद निकम व राजेश बारणे यांनी केले. तर आभार हरिश्चंद्र गडसिंग यांनी मानले.
अभ्यासिकेला पुस्तकांची भेट
स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासिकेचे उद्घाटन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. उद्योजक स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या स्मरणार्थ निबंध स्पर्धासाठी आर्थिक मदत व दुर्मिळ दीड हजार पुस्तके ट्रस्टला भेट दिली. डॉ. अशोकराव निकम यांच्या वतीनेही वित्तीय विषयावरील पुस्तके अभ्यासिकेला भेट देण्यात आली.