कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रम, विवाह सोहळ्यात भोजनाचा स्वाद म्हटल की, पोळी, वांगे, मसालेदार भाजी, भात असा विविध चवदार पदार्थांची रेलचेल असे. पूर्वी हे पदार्थ आळावर अर्थात चुलीवर मोठी हंडी ठेवून केले जात असे.
मात्र आता ती प्रथा कालबाह्य होत चालली असून या चवदार भोजनाचा अस्वाद नागरिकांना घेत येत नाही. अशा अनेक परंपरा लोप पावत असून आता आळावरील जेवणाची पद्धत ही कालबाह्य होताना दिसत आहे.
ग्रामीण भागामध्ये आळावर दोन हंडी ठेवल्या जात असे. त्यात काही ठिकाणी बत्त्या असे म्हटले जात. तर, काही ठिकाणी हंडी असे म्हटले जात होते. एकामध्ये भात, दुसऱ्यामध्ये वरण तर तिसऱ्यामध्ये भाजी अशा प्रकारे जेवण बनवले जात होते. तसेच मंडपामध्ये लांबच लांब पंगत बसून विविध वाडपींकडून भोजन वाढताना दिसत.
तर, पंगतीमध्ये बसलेली मंडळी श्लोक म्हणून भोजनाचा स्वाद घेण्यास सुरुवात करत असे. आता मात्र, त्याची जगा बफेने घेतली असली तरी पंगतीच्या भोजनाचा स्वाद आठवणीत नक्कीच राहत आहे.
चुलीची जागा गॅसने घेतली
ग्रामीण भागातील आळावरचे जेवण आता कालबाह्य होत चालले असून या चुलीचा जागा गॅस सिलिंडर, शेगडीने घेतली आहे. कमी कालावधीमध्ये झटपट तयार होण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ लागला आहे. तर, पंगती न पडता बफे पद्धतीप्रमाणे जेवण वाढण्याचे पद्धत दिसत आहे.
आग्रहच राहिला नाही
ग्रामीण भागामध्ये बफे पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ग्रामीण भागात आजही विविध कार्यक्रमांमध्ये पंगतीमध्ये भोजन आस्वाद घेण्यास मिळत आहे. मात्र, आळावरील (चुल भट्टी) भोजनाचा आस्वाद आठवणीत नक्कीच राहणार आहे. सध्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, वेळ खर्च होत असला तरी, पंगतीप्रमाणे आग्रहाने जेवण वाढणे आता बंद झाले आहे.