पवनानगर {नीलेश ठाकर} – पवन मावळातील जंगल परिसरात फुललेला रानमेवा घेऊन येणाऱ्या डोंगरी भागातील नागरिकांच्या आरोळ्यांनी शहरी भागामधील गल्लीबोळ दुमदुमत आहेत. डोंगरी भागातील रहिवाशांमुळे जांभळे, करवंदे, आंबोळी, आळू व इतर रानमेव्यांची चव चाखण्याची संधी मावळकरांना उपलब्ध होत आहे. या रानमेव्याच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नामुळे डोंगरी भागातील अर्थकारणास चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मावळ तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे असणाऱ्या डोंगररांगा आणि जंगलात जांभळाची झाडे तसेच करवंदांच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील रहिवासी या जाळ्यांवरील करवंदे, झाडावरील जांभळे तसेच आळू, आंबोळी तोडून ती विकण्यासाठी घेऊन दररोज भल्या सकाळी रेल्वे, तसेच आसपासच्या पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासारख्या शहरी भागात आणि मावळ तालुक्यातील शहरी भागात दाखल होत आहेत.
उन्हाचा तडाखा वाढण्याअगोदर नेहमीच्या भागात जाऊन, जांभळे, करवंदे अशी आरोळी देत ती विकण्यावर या डोंगरातील विक्रेत्यांचा भर असतो. बहुतांशी रानमेव्यांच्या झाडांना जानेवारीनंतर फुले येण्यास सुरुवात होते. फुलांची अवस्था संपल्यानंतर एप्रिलमध्ये फळांचा बहर सुरू होतो.
फळांचा बहर सुरू झाल्यानंतर डोंगरी भागातील रहिवाशांची तोडणी, वाहतूक ते विक्री यासाठीची तयारी सुरू होते. सकाळी सकाळी किंवा उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर दुपारच्या सुमारास तोडणीच्या कामास सुरुवात होते. ही तोडणी दुसऱ्या दिवशीच्या विक्रीसाठीची असते.
तोडणी झाल्यानंतर ती अलगद पाटीत ठेवत ती शहरी भागात आणत त्याच्या विक्रीसाठीची लगबग दररोज या भागातील महिलांची सुरू असते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच अर्थचक्र सुरू राहण्यास मदत होते.
बहुतांशी डोंगरी भागातील रहिवाशांचा पशुपालन आणि पावसाळी शेती हेच रोजगाराचे मुख्य साधन असते. उन्हाळ्यात या रोजगारावर मर्यादा येतात. यामुळे संसाराच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रानमेव्याचा आधार घेण्यात येतो.
घरातील सर्वचजण या कामात गुंतलेले असतात. डोंगर, जंगलात जाऊन तोडणी करायची, त्याची वाहतूक करायची आणि नंतर विक्रीसाठीची घरगुती व्यवस्थापन कार्यरत असते. रानमेव्याच्या विक्रीच्या कामात बहुतांश महिलाच अग्रेसर असतात.
रानमेळा विक्रीसाठी जुनीच मापे
पूर्वीच्या काळची मापनपद्धती असणारी चिपटे, मापटे, चिळव, निळव आदींचा वापर या व्यवसायादरम्यान अजूनही होत आहे. इतर ठिकाणी वजनकाटा, इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर वजन, मापनासाठी होत असला तरी जांभळे, करवंदांच्या विक्रीत प्रामुख्याने जुन्या मापन पद्धतीचा वापर होतो. रानमेवा आरोग्यदायी असल्याचे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.