मुंबई – वेस्ट इंडिज व अमेरिकेत पुढील वर्षी होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार असे संकेत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिले आहेत. टी-२० क्रिकेट खेळण्याची रोहित शर्माची इच्छा आहे किंवा नाही ते ठरवण्यासाठी अद्याप मोठा कालावधी आहे मात्र, आम्ही सध्या त्याच्या पर्यायाचा विचार करत आहोत व पंड्या टी-२० संघाचे नेतृत्व करत आहे तर तोच या स्पर्धेसाठीही कर्णधार असेल, असेही शहा यांनी सांगितले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विस्वकरंडक स्पर्धेत अफलातून कामगिरी केली. मात्र, रोहितने गेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर अद्यापएकही टी-२० सामना खेळलेला नाही. तसेच त्याने आत्ता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेतूनही माघार घेतली आहे. अशा स्थितीत तो पुढील वर्षीच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नेतृत्व करेल का हा प्रश्न आहे. तसेच तो या स्पर्धेत खेळणार तरी आहे का याबाबतही त्याने बीसीसीआयशी अद्याप चर्चा केलेली नाही.
येत्या काळात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर रोहितशी चर्चा करतील व त्यानंतर बीसीसीआय संघाच्या कर्णधारपदी कोण असेल त्याची घोषणा करेल. मात्र, सध्या तरी पंड्याच नेतृत्व करेल असे चित्र शहा यांच्या वक्तव्वरून दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२०, एकदिवसीय व कसोटी मालिकांसाठी तीन वेगवेगळे कर्णधार आहेत.
पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र, तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होइल, असेही शहा म्हणाले. विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी जुनमध्ये होणार आहे त्यामुळे पंड्या त्यापूर्वी संघात परतेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे, तर एकदिवसीय सामन्यांच्या संघाचे कर्णधारपद लोकेश राहुलकडे सोपवण्यात आले आहे. कसोटी मालिकेत मात्र, रोहितच नेतृत्व करणार आहे. रोहितसह विराट कोहलीनेही या दौर्यातील मर्यादीत षटकांच्या सामन्यांतून माघार घेतली आहे. त्यांच्यासह सर्व वरिष्ठ खेळाडू कसोटी मालिकेसाठी संघात परततील.