Entertainment : अभिनेता रोनित रॉयने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच त्याची सुरक्षा एजन्सी देखील आहे. रोनितची एजन्सी इंडस्ट्रीतील सर्व आघाडीच्या सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवते. मात्र करोना काळ त्याच्या व्यवसायासाठी खूप कठीण काळ ठरला होता. मात्र त्याच्या या कठीण काळात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि करण जोहर यांनी त्याला मदत केल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.
रोनित रॉय म्हणाला की, “करोना काळात त्याचे काम बंद झाले होते आणि त्याच्यावर १३० कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी होती. त्या काळात त्याचे सुरक्षारक्षक कामावर नसतानाही अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि करण जोहर यांनी सेवेचे पूर्ण पैसे दिले होते. सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही पगार देण्याचं ठरवलं. त्यांचा पगार देताना मला समजलं की घरात खूप निरुपयोगी गोष्टी पडून आहेत. मी वापरत नसलेल्या कार होत्या, माझ्याकडे एक मिनी कूपर होती, जी मी कधीही चालवणार नाही हे मला माहीत होतं म्हणून मी ती विकली. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आम्ही इतरही अनेक लक्झरी वस्तू विकल्या. खरं तर मी कोणावरही उपकार केले नाही, ती माझी जबाबदारी होती.”
आमिर खान आणि करण जोहरने आपल्या वडिलांना गमावलं त्या काळात आपण त्यांच्यासोबत होतो, असा खुलासा मुलाखतीदरम्यान रोनितने केला. “मी आमिरबरोबर होतो, त्याला सुरक्षा देण्यासाठी मी ‘लगान’च्या सेटवर होतो. आम्ही मित्रही होतो, मला माहित आहे की तो माझ्यावर किती प्रेम करतो. करण माझा आवडता आहे. पण तो त्याच्या वडिलांइतका माझा आवडता कधीच नसेल. मला सुरुवातीच्या काळात ऋषी कपूर, रणधीर कपूर, यश जोहर यांच्याकडून खूप प्रेम मिळालं,” असं रोनित म्हणाला. करोना काळात सेवा न पुरवताही पैसे देणाऱ्या सेलिब्रिटींची नावं रोनितने घेतली. “अक्षय कुमार, करण जोहर व अमिताभ बच्चन सरांचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांनी सेवांशिवाय दिले. त्यांच्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला.”