आचार्य अत्रे पुरस्कारांचे वितरण
सासवड – महाविकास आघाडीला सुगीचे दिवस येणार आहेत. जे सत्य आहेत. शिदे-फडणवीस सरकारनेच हे कबूल केले आहे. आता रयतेचे राज्य 2024 मध्ये येणार आहे. आपण आता पूर्ण ताकदीने कामाला लागले पाहिजे. या सरकारचे अपयश हे वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून दिसते आहे. स्वतःला कमी गुण पडल्याचे हे मान्य करणारा पहिला पक्ष आहे, असा घाणाघाती आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे यांच्या 54 व्या स्मृतिदिनानिमित्त आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार कविवर्य विठ्ठल वाघ, आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार मधुकर भावे, आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार श्रीधर फडके यांना आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.
यावेळी आचार्य अत्रे यांचे नातु विक्रम पै, आचार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा बॉकेचे आध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, माणिक झेंडे पाटील, राहुल गिरमे, ऋतुजा धुमाळ, राजेश चव्हाण, पुष्कर जाधव, ईश्वर बागमार, दिलीप बारभाई शामकांत भिंताडे, बाळासाहेब भिताडे, बाळासाहेब कामथे, गौरव कोलते, शिवाजी कोलते, वृषाली जगताप, नंदकुमार दिवसे उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, आजच्या वर्तमानपत्रांमध्ये मतदान सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी ईच्छुक आहे. म्हणजेच 53.6 टक्के जनता विरोधात आहे.
मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली म्हणजेच 50.7 टक्के जनता आमच्याबरोबर आहे.
“त्यासाठी प्रयत्न करू’
आचार्य अत्रे यांचे विचार जनतेसमोर पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम केले पाहिजे त्याचबरोबर आचार्य त्यांच्या भाषणे त्याचबरोबर साहित्य हे सोशल मीडियावर कमी वेळेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.