पळसदेव : पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत पळसनाथाचे प्राचीन मंदिर हे इतिहासाचा ठेवा असून, ते जतन करणे गरजेचे आहे. यासाठी आपण प्रयत्न करु असे मत खासदार सुप्रिया सुळे पळसनाथ मंदिराच्या पाहणी दरम्यान व्यक्त केले.
गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या पाण्यात असलेले हे प्राचीन पळसनाथाचे मंदिर सध्या पाण्याबाहेर आले आहे. या मंदिराची खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, बाळासाहेब काळे, हनुमंत बनसुडे, मेघराज कुचेकर, अजित शिंदे, सरपंच अजिनाथ पवार, उपसरपंच कैलास भोसले,इंद्रायणी मोरे, अजय बनसुडे सखाराम खोत, सतीश मोरे यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुळे पुढे म्हणाल्या, उजनी धरणाचं पाणी कमी झाल्यानंतर या मंदिराचं दर्शन होत असल्याची बाब पर्यटकांसाठी अडचणीची आहे. यामुळे या मंदिराचं जतन होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येतील, याबाबत पुरातत्व विभागाशी बोलणं झालेलं आहे. मंदिराच जतन करण्याबरोबर पर्यटकांना येथे आकर्षित करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला पाहिजे.
दरम्यान येथील पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे. मात्र मंदिरालगत आणखी पाणी असल्याने काही अंतर बोटीने प्रवास करून जावे लागते. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बोटीने प्रवास करत, गाळ, चिखल तुडवत मंदिरात प्रवेश केला. प्राचीन मंदिराची बांधणी, त्यावरील कोरीव शिलांची पाहणी खासदार सुळे यांनी केली. येथील प्रवीण हिंगमिरे या तरुणाने प्राचीन मंदिर, दगडी मंदिर, शीलालेख, विरगळी व त्यावरील शिलांचा अर्थ, सप्तसुर शिला आदींची माहिती दिली.
राष्ट्रवादीतील गटवाजी पुन्हा उघड
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा नव्याने समोर आली. मंदिर पाहण्यासाठी येणाऱ्या खासदार सुळे व कार्यकर्त्यांसाठी येथे दोन्ही गटाने शामियाना (मांडव) उभारण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय मंदिराकडे जाण्यासाठी बोटींची व नाश्त्याचीही सोय करण्यात आली होती. यामुळे येथे येणाऱ्यांना नेमक्या कोणत्या मांडवात जावे हाच प्रश्न पडत होता. यामुळे शेजारी-शेजारी उभारलेले मांडव उपस्थितांच्या चर्चेचा विषय झाला होता.
ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सरपंच निवडीच्या कार्यक्रमापासून येथे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. तर आज राष्ट्रवादीच्या काही ग्रामपंचायत सदस्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे टाळले. यामुळे या दोन्ही गटांचे मनोमिलन करुन त्यांच्यात समझोता निर्माण करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सामान्य कार्यकर्ते बोलून दाखवित होते.