दापोडी येथे महावितरण कार्यालयावर मोर्चा
केडगाव -विजेच्या अपुऱ्या दाबामुळे दौंड तालुक्यातील शेतकरी बांधव मेटाकुटीला आला आहे. शासन व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा अंत पाहू नये, असे मत दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
आज (मंगळवारी) वीज वितरण कंपनीच्या दापोडी येथील कार्यालयावर थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वीज कंपनीच्या आणि शासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, जि. प. माजी सदस्य वीरधवल जगदाळे, युवक अध्यक्ष विकास खळदकर, बाजार समिती माजी सभापती दिलीप हंडाळ, संचालक पोपटराव ताकवणे, संभाजी ताकवणे, डॉ. वंदना मोहिते आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कमी दाबाने होणारा वीजपुरवठा वाढते भारनियमन, नादुरुस्त रोहित्र, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा या सर्व कारणांमुळे दौंड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना केवळ शासन आणि वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या नियोजनाचा फटका शेतकरी बंधूंना बसत आहे. त्यांचा आवाज शासन दरबारी पोहचवण्यासाठी सदर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मागील वर्षीच्या अखेरीला चांगला पाऊस झाल्याने सध्यातरी पाण्याची स्थिती चांगली आहे. विहिरीत पाणी आहे; परंतु ते पिकांना देण्यासाठी वीजेचा प्रश्न निर्माण होत आहे. अधिकारी वर्गाने शेतकरी बांधवांचा अंत पाहू नये, योग्य नियोजन करून वीजपुरवठा केल्यास शेतकरी बांधवांना मोर्चा काढण्याची आवश्यकता भासणार नाही.
-रमेश थोरात,माजी आमदार दौंड