करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातला आहे. या लाटेचे चटके लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वानाच बसले आहेत. दरम्यान, या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याचे कारण सांगितले आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचे प्रमाण वाढले असावे असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.
तरुणांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे का असा प्रश्न विचारण्यात आला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी याविषयी माहिती दिली. “पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यामध्ये वयात जास्त फरक असल्याचे दिसत नाही. प्रतिकूल परिणामासाठी ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात”. “तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण थोडं वाढल्याचं दिसत आहे, कारण अचानक त्यांना घऱाबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशात करोनाच्या विषाणूचा नवा प्रकार आढळत असून त्याचाही परिणाम झालेला असू शकतो,” असे बलराम भार्गव यांनी यावेळी सांगितले.
भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान १६ राज्यांमध्ये ज्यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पंजाब यांचा समावेश आहे तिथे रुग्णसंख्या वाढत असतानाही देशात मात्र सध्या करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा हे त्या १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी आहेत जिथे दैनंदिन रुग्णसंख्येत सतत वाढ किंवा घट होत आहे. दरम्यान १६ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल. पंजाब, आसाम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, मेघालय आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.