बीड – गेली 60-65 वर्षे हे झोपले होते का, आता आरक्षणच्या मुद्द्याला मुखवटा बनवून राष्ट्रवादीचे लोकं मतं मागत आहेत. गेल्या 50-60 वर्षे त्यांना कधीच वाटले नाही, जातीचं बघावे, असे म्हणत भाजप नेत्या आणि उमेदवार पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्लबोल केला.
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून बीड जिल्ह्यातही 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या बीड लोकसभा मतदारसंघात राजकारण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांकडून या मुद्दयासंदर्भात भाष्य केले जाते. दरम्यान, पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या नेकनूर येथील सभेत मराठा समाजाला आवाहन करताना नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, काळजावर हात ठेऊन सांगा, मी कधी जातीवाद केला का? अहिल्यादेवींनी जसा राज्य कारभार केला, जिजाऊंनी जसे शौर्य दाखवले, जसे धैर्य सावित्रीबाई फुलेंनी वापरले. तसेच, शौर्य, धैर्य आणि औदार्य दाखवण्याची गरज आता महिला भगिनींवर आली आहे. माझ्या जिल्ह्याच्या बंधुभावाची, माझ्या जिल्ह्याच्या सुंदर सलोख्याची तस्करी करण्याचे प्रयत्न हाणून पाडा, असे म्हणत त्यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला.
तसेच मराठा आरक्षणाचा हिरो कोण आहे?, हो मनोज जरांगे आहेत. त्यांची भक्ती करा ना, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जा, त्यांच्या पोस्ट टाका, त्यांचे त्याग, बलिदान, त्यांचे कष्ट याचा आम्हाला आदरच आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले ते भाजप सरकारनेच दिले. मात्र, यांचे सरकार ते आरक्षण कोर्टात टिकवू शकले नाहीत, असे त्या म्हणाल्या.