वॉशिंग्टन – अमेरिका भारतात होत असलेल्या निवडणुकांमध्ये (India’s Lok Sabha elections) हस्तक्षेप करत असल्याचा आरोप रशियाने काल केला होता. त्यांच्या या आरोपांना अमेरिकेने उत्तर दिले आहे. भारतच नाही तर जगातल्या कोणत्याही अन्य देशांतील निवडणुकांमध्ये आमचा सहभाग नसतो. भारताच्या निवडणुकीच्या संदर्भात भारताची जनताच निर्णय घेईल असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकात अलिकडेच एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात असा अरोप केला होता की भारताची गुप्तचर संस्था रिसर्च ॲंड ॲनालिसिस विंग अर्थात रॉचे अधिकारी खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या कटात सहभागी होते. त्या लेखावरूनच रशियाने भारताच्या संदर्भात अमेरिकेवर आरोप केले होते.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा म्हणाल्या होत्या की, अमेरिका नियमितपणे नवी दिल्लीच्या विरोधात निराधार आरोप करतो आहे. केवळ भारतावरच नव्हे तर अन्य देशांवरही कथित धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाचे आरोप अमेरिकेकडून केले जात आहेत. या निराधार आरोपांतून हे स्पष्ट होते की अमेरिकेला भारताचा राष्ट्रीय विचार समजत नाही. भारताच्या विकासाच्या ऐतिहासिक संदर्भाचीही अमेरिकेला समज नाही आणि एक राष्ट्र म्हणून अमेरिका भारताचा आदर करत नाही.
Netanyahu on US Threat : गरज पडली तर आम्ही बोटांच्या नखांनीही लढू- नेतान्याहू
अमेरिकेच्या या वर्तणुकीला वसाहत कालीन मानसिकता असे संबोधून जाखारोवा म्हणाल्या की भारतातील लोकसभेच्या निवडणुका क्लिष्ट करण्यासाठी भारताची अंतर्गत राजकीय स्थिती असंतुलित करण्याचा अमेरिका प्रयत्न करते आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये लूडबूड करण्याचा हा प्रकार आहे.
दरम्यान, रशियाच्या या शाब्दीक हल्ल्यानंतर आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली व त्यांनी उत्तरे टाळण्याचाच प्रयत्न केला. जोपर्यंत हे आरोप न्यायपालिकेसमोर सिध्द होत नाहीत तोपर्यंत ते केवळ आरोप आहेत. हा कायदेशीर मुद्दा असल्यामुळे मी यावर येथे काही बोलणार नाही असे अमेरिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.