पुणे : टाळेबंदीत शहरात अडकून पडलेले विद्याार्थी, परप्रांतीय कामगार, पर्यटक, अन्य कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मूळगावी पाठविण्यासाठी केंद्र शासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शहरात अडकून पडलेल्या नागरिकांना मूळगावी पाठविण्यासाठी पुणे पोलिसांकडून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष (मायंग्रट सेल) कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्याअंतर्गत तसेच परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी परवानगी देण्याचे काम या कक्षाकडून करण्यात येणार आहे.
ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी समन्वय आधिकारी म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे. समूह स्वरूपात राज्याअंतर्गत तसेच परराज्यात प्रवासास परवानगी देण्यासाठी समन्वय आधिकारी म्हणून पुणे महानगर विकास प्राधिकरणातील पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. मूळगावी जाणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात येणार असून पोलीस ठाण्याच्या स्तरावर ही माहिती संकलित करण्यासाठी एक पोलीस निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.