पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वानवडी भागातील मोठ्या सोसायटींच्या परिसरात रस्ते लहान झाले आहेत. तुलनेने वाहनांची संख्या मात्र जास्त आहे. परिणामी, या भागाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. या भागात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र अॅक्शन प्लॅन करण्यावर आपला भर राहणार आहे, असे आश्वासन पुणे कॅन्टोन्मेंट-वानवडी भागात पुणे लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांना दिले.
धंगेकर यांच्या प्रचारार्थ भैरोबा नाला येथून सुरू झालेली पदयात्रा फातिमा कॉन्व्हेंट, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, माजी महापौर प्रशांत जगताप यांचे जनसंपर्क कार्यालय, संविधान चौक, केदारी नगर परिसरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर नेताजी नगर येथे धंगेकर यांनी मतदारांशी संवाद साधला.
पदयात्रेत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शिवाजी केदारी, साहिल केदारी, सुनाम जांभूळकर, मिलिंद अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रत्नप्रभाताई जगताप, प्रफुल्ल जांभूळकर, केविन मॅन्युअल, प्रीती चढ्ढा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमेश सोनावणे, ओंकार जगताप, रवींद्र जांभूळकर, वेदांत नांगरे, आरपीआयच्या प्रियदर्शनी निकाळजे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
धंगेकर म्हणाले, “वानवडी भागातील प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक नागरिकांचाही सहभाग घेत प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच या भागातील नागरी सुविधांचा प्रश्नही सोडविण्यावर आपला भर राहणार आहे.’